गणेश सावंत । बीड
जिल्ह्याच्या राजकारणातलं थोरलं घर म्हणून ज्या घराण्याकडे पाहितलं जातं त्या क्षीरसागर घराण्याकडे एक-दोन पंचवार्षिक वगळता नगरपालिका स्थापनेपासून सर्वात जास्त सत्ता ही क्षीरसागरांकडे राहिलेली आहे. डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची ओळख अध्यक्ष म्हणून होण्याचे कारणही नगरपालिकेतली आजपर्यंतची निर्विवादीत सत्ता होय. अशा परिस्थितीत या राजकीय थोरल्या घराला उद्याच्या निवडणुकीत नेमके काय करायचे आहे हे अद्याप मतदारांनाच सोडा कार्यकर्त्यांनाही माहित नसल्याचे सांगण्यात येते. राज्यातल्या राजकारणासह जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात झालेले स्थित्यांतरे आणि थोरल्या घराने घेतलेले राजकीय निर्णय त्या राजकीय निर्णयात राज्य पातळीवर झालेल्या उलथापालथीत पाहता उद्याच्या निवडणुकीत थोरले घर कुठले चिन्ह घेऊन मतदारांच्या समोर जाणार याबाबतची अनिश्चितता स्वतंत्र नेतृत्व उभा करू पाहणार्या अन्य पक्षांतील अभिलाषी नेत्यांना संधी देणारं.
गेल्या पंचवार्षिकमध्ये राजकीय थोरल्या घरात भाऊबंदकी उफळून आली अन् थोरल्या घराचे दोन स्वतंत्र राजकीय काफिले शहरात तयार झाले. सेक्युलर विचारसरणी घेऊन आजपावेत राजकारण करणार्या या थोरल्या घरात सेक्युलर विचार कायम लोकांसमोर घेऊन जाण्यासाठी दोन्ही काफिल्यांनी तेव्हा सुरुवात केली. मात्र नेतृत्वाने एका काफिल्याला कायम रसद पुरवणं सुरू ठेवत जो काफिला निष्ठेचा आहे त्याकडे दुर्लक्ष केले. राष्ट्रवादीचं हे वागणं थोरल्या घरचे थोरले जयदत्त क्षीरसागरांना पटलं नाही. गेल्या नगरपालिका निवडणुकीत जयदत्त क्षीरसागरांचे बंधू डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढवली तर थोरल्या घरातून विभक्त झालेले संदीप क्षीरसागरांनी काकु-नाना आघाडी उघडली. ती निवडणूक दोघांसाठीही अस्तित्व दाखवणारी ठरली. संदीप क्षीरसागरांनी 20 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणले खरे मात्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीत थोरलं घर वरचढ ठरलं. इथपर्यंत सर्वकाही ठिक असताना विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने जयदत्त क्षीरसागरांपेक्षा संदीप क्षीरसागरांना महत्व देत उमेदवारी दिल्यानंतर क्षीरसागरांनी थेट शिवसेनेत प्रवेश करत शिवसेनेच्या धनुष्यावर निवडणूक लढवली. या निवडणुकीत क्षीरसागरांना पराभव स्वीकारावा लागला तर संदीप क्षीरसागर सारख्या तरण्याताठ्या युवा नेत्याला बीडचं नेतृत्व करण्याचं सौभाग्य मिळालं. मात्र नंतर पाच वर्षांच्या कालखंडात थोरलं घर विरुद्ध थाकल्या घराचं वारस यांच्यात बरच काही घडलं. संदीप क्षीरसागरांचं नेतृत्व स्वीकारून आघाडीत लढलेल्या नगरसेवकांनी संदीप क्षीरसागरांविरोधातच आक्रमक धोरण आखलं अन् संदीप क्षीरसागरांचं नेतृत्व नाकारत पुन्हा थोरलं घराचं नेतृत्व अंगीकारलं. मात्र या कालखंडात शिवसेना पक्षात डेरेदाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागरांना कडवट शिवसैनिकही होता आलं नाही अन् निर्पेक्ष नेतृत्व घेऊनही जनतेसमोर थेट जाता आलं नाही. आता नगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. अशा परिस्थितीत राजकारणातलं हे थोरलं घर जनतेसमोर शिवसेनेचं चिन्ह घेऊन जाणार का? यावर अद्यापही मतदारांना सोडा कार्यकर्त्यांनाही माहित नाही. त्यात राज्यपातळीवर शिवसेनेत झालेली अंतर्गत बंडाळी उभं राहिलेलं सर्वात मोठं बंड पाहता जयदत्त क्षीरसागर काय निर्णय घेणार? ते उद्धव ठाकरेंसोबत राहणार की, (पान 7 वर)
बंडखोर एकनाथ शिंदेंसोबत जाणार ? याबाबतही गेल्या पंधरवाड्यात त्यांच्याकडून प्रतिक्रिया थेटपणे कुणालाच मिळाली नाही. बीडचं राजकारण हे कधीही कुणाला लक्षात आलं नाही ते थोरल्या क्षीरसागरांना कायम लक्षात आलेला आहे. कुठल्या वार्डात कुठली भूमिका घ्यायची इथपासून कुठल्या घरातलं मत कुठे जाणार इथपर्यंत इत्यंभूत माहिती ठेवणारे थोरले क्षीरसागर नगरपालिका निवडणूक घोषीत झाल्यानंतरही चिन्हा बाबत शांत दिसतात तेव्हा कार्यकर्ते प्रचाराची सुरुवात अथवा निवडणुकीची व्यूहरचना आखण्याची सुरुवात तरी कसे करतील. क्षीरसागर हे सेक्युलर आहेत, बीडमध्ये मुस्लिमांसह अन्य सेक्युलर विचाराचा मताचा मोठा गठ्ठा आहे. अशा स्थितीत शिवसेनेच्या चिन्हावर विजयश्री खेचता येईल का? की आघाडी करावी लागेल? या द्विधामन:स्थितीत सध्यातरी थोरलं घर दिसतय. अशा स्थितीतही त्यांनी वारस म्हणून या निवडणुकीत डॉ. योगेश क्षीरसागरांना गेल्या काही दिवसांपुर्वीच लाँच केले आहे. आता योगेश क्षीरसागर हे शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन मैदानात उतरतात की, आघाडीच्या जोरावर निवडणूक लढवतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.