गणेश सावंत-9422742810
मराठे युद्ध जिंकतात, तहात हारतात, असे नेहमी म्हटले जाते. या म्हणण्याला आणि त्यातील तथ्याला नक्कीच इतिहासाची झालर आहे, मात्र इतिहासाची उजळणी करताना वर्तमान आणि भविष्यात तेच होईल, हा आभास निर्माण करणे अथवा तशी न्यूनगंडता मनी आणणे ते दुर्लभतेचे लक्षण म्हणावे लागेल. मराठा आरक्षणावरून जो काही निर्णय झाला आणि त्या निर्णयानंतर जो काही विजयी उत्सव होत आहे त्यात पुन्हा एकदा तहाच्या बोलणीवरून मराठे हारले की जिंकले यावर काथ्याकुट केलं जातय. परंतु आमच्या मते मराठे युद्ध सहज जिंकतात पण मराठ्यांना एकत्रित आणणे हे जिक्रीचे काम असते. त्यामुळे आरक्षणाच्या लढ्यात मराठे जिंकल्यापेक्षा मनोज जरांगे पाटील यांनी अखंड मराठ्यांना एकत्रित आणले हा एकेविसाव्या शतकात तरी मराठ्यांचा पहिला विजय मानावा लागेल. आरक्षणाच्या मागणीचे फलित काय असेल, अथवा चालू लढ्यामध्ये मराठ्यांना काय मिळाले या दोन प्रश्नांचे सहज आणि सकारात्मक उत्तर ते तेच येईल, मराठे एकतर एकत्रित आले आणि दुसरे म्हणजे कुणबी असताना मराठ्यांना जे दाखले द्यावे लागत आहेत, त्या दाखल्यातून लाखाच्या भरात मराठे हक्काच्या कुणबी जातीमध्ये येऊन बसले. मग या लढ्याला अथवा या लढ्याचं नेतृत्व करणार्याला यश-अपयशाच्या पायरीवर नेणे सध्या तरी त्या लढ्याबाबत आणि त्या लढ्याच्या नेतृत्वाबाबत अन्याय म्हणावा लागेल. इतिहासाची साक्ष देताना तुम्ही-आम्ही नेहमी
पुरंदरचा तह
याचे उदाहरण सकारात्मक आणि भविष्याचा वेध घेणारा घटनाक्रम म्हणून देत आलो आहोत. राजा जयसिंह जेव्हा ऐंशी हजाराची फौज घेऊन मराठा साम्राज्यावर धावून आला, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी परिस्थिती ओळखून जो निर्णय घेतला तो निर्णय दोन पावले मागे जाण्याचा होता. जर आपण राजा जयसिंहाच्या ऐंशी हजार फौजेसोबत लढा देत राहिलो तर मराठा मुलुखातल्या रयतेला त्रास होईल आणि स्वराज्याचेच नुकसान होईल. तिकडे शहाजी राजेंच्याही अडचणी वाढतील, अशा स्थितीत राजकीय दावपेच आखणे अधिक महत्वाचे असते आणि तेच राजकीय डावपेच आखत शिवरायांनी आपल्या ताब्यातले 23 किल्ले हे राजा जयसिंहाशी तडजोड करत वापस दिले. स्वत: औरंजेबाच्या दरबारात जाण्याचा प्रस्ताव स्वीकारला. याचा फायदा मराठा मुलुखातली शत्रुच्या सैन्याची वर्दळ थांबली. मराठी मुलुखात जी अशांतता निर्माण होणार होती ती झाली नाही, एकूणच काय तर परिस्थिती पाहून दोन पावले नक्कीच मागे आले. तर नेतृत्व, नेतृत्वाची उंची खुंटत असते. आताही मराठा आरक्षणाच्या लढ्यातला मोर्चा थेट मुंबईच्या वेशीवर जावून थांबला होता. इथे मनोज जरांगे पाटलांसोबत जे मराठे होते ते हजारात नव्हते तर लाखात होते. अशा वेळी मुंबई महानगरीचे काय हाल झाले असते आणि तेथील रयतेची मराठ्यांबाबत काय भावना झाली असती हे सांगणे कठीण. अशा वेळी मुंबईच्या वेशीवर वाशीचा तह
आज मितीला अत्यंत महत्वाचा मानला जातो. या तहात मराठे हरले आहेत का? तर हो. मराठे जिंकले आहेत का तरी हो. हारणे आणि जिंकणे किंवा जय आणि पराजय याचं उत्तर एकत्रित कधीच देता येत नाही हे आम्हाला काय कुणालाही चांगले ठाऊक आहे, पण तरीही आम्ही मोठ्या धाडसाने हे उत्तर देतो. वाशीच्या तहात नेमके घडले काय? मराठा आरक्षणाबाबत सरकारने जे कागदी पत्तरवाळ्या मराठ्यांच्या हाती दिल्या त्याला खरच महत्व आहे का? जी अधिसूचना काढली आहे त्यात मराठ्यांचा जय आहे का? हे सर्व पहाताना एक लक्षात घेऊ… मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे ही प्रमुख मागणी आणि या मागणीसाठी सगेसोयर्यांची त्याला जोडली गेलेली पुरवणी या तहातला सर्वात मोठा कळीचा मुद्दा मानला गेला. कुणबी वंशावळ असलेल्या मराठ्यांना एकीकडे ओबीसीमध्ये सामावून घेतले जात आहे आणि आता त्यांच्या सग्यासोयर्यांनाही या अधिसूचनेनंतर घेतले जाईल. परंतु ही अधिसूचना अध्यादेश आहे का? तर नाही. अध्यादेश काढणे म्हणजे ज्या क्षणी त्या अध्यादेशावर स्वाक्षरी होते त्या क्षणापासून त्या अध्यादेशाची अमबजावणी सुरू होते. रिकामी जागा करून सोडलेली अधिसूचना काढून सरकारने पुन्हा एकदा मराठा आंदोलकांसोबत वेळकाढूपणा केला यात दुमत असण्याचे कारण नाही. सरकारने वेळकाढूपणा केला म्हणजे
आंदोलक मॅनेज झाले का?
अशी आवई कोणी जर उठवत असेल तर ते लोक मराठ्यांच्या ज्या पोरांनी आत्महत्या केल्या त्या बलिदानाला ते विसरत असावेत. हे आंदोलन कोण्या एकट्या जरांगे पाटलाचे नाही अथवा या आंदोलनाचे यश-अपयश कोण्या एकट्या मराठ्याचे नाही. मुंबईच्या वेशीवर आलेल्या लाखोंच्या संख्येतील मराठ्यांच्या या आंदोलनाला नक्कीच कुठेतरी विसावा गरजेचा होता. कारण गेल्या पाच महिन्यापासून मराठ्यांच्या तना-मनातल्या आगीचा वणवा मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वातून उभ्या महाराष्ट्रात पेटला. तो वणवा आटोक्यात होता, नैसर्गिक होता तोपर्यंत ठिक. मात्र त्या वणव्याला विसावा मिळाला नसता तर तो अधिक तीव्रतेचा मानवरचित प्रायोजित झाला असता आणि त्यात देशाचाी आर्थिक राजधानी मुंबईला सर्वाधिक झळ पोहचली असती. त्यामुळे वाशीच्या तहामध्ये मनोज जरांगे पाटलांची आणि सरकारने जी काही बोलणी केली ती बोलणी यथयोचीत पुर्णत्वाकडे जावी एवढी अपेक्षा अन् मराठ्यांच्या आंदोलनाला मिळालेला विसावा हा आंदोलनकर्त्यांचा धोरणात्मक निर्णय असेल, तर या आंदोलनाचा वणवा, त्याची आग मराठ्यांच्या तना-मनात कायम पेटती वात म्हणून पेटत राहील. या आंदोलनामधून जय-पराजयाचा काथ्याकुट करताना
राजकीय पैलू
जोडले जातात, आणि ते जोडायलाही हवेत. उघडपणे काही दिसत असेल तर ‘सत्य-असत्याशी मन केले ग्वाही मानलिये नाही बहुमता’ म्हणत बोलतेही व्हायला हवे. गेल्या पाच महिन्यांच्या या आंदोलनामध्ये मराठा असो अथवा अमराठा नेता एकही प्रत्यक्षात सहभागी झाल्याचे दिसून आले नाही. मराठा समाजाने जरांगेंच्या नेतृत्वात आंदोलन उभे केले, ते वाढले, ते एवढे मोठे झाले की मराठा समाजातल्याच सत्ताभोगी पुढार्यांना त्या आंदोलनाची धास्ती नव्हे तर भीती वाटू लागली. अशा वेळी एखाद्या समाजाचं नेतृत्व करत आपण सत्ताभोगी करत असू, त्या नेत्याने या आंदोलनाला उघड विरोध केला ते म्हणजे भुजबळांपासून अन्य काही ओबीसी समाजातील नेते. त्यांनी विरोध करणे यातही गैर नाही. समाजाच्या भावना ते जर समोर मांडत असतील आणि त्या मांडताना त्यातली विश्वासार्हता समोर येतेच. त्यामुळे मराठ्यांनी त्यांना पाण्यात पाहणेही चुकीचे. परंतु इथे काय होतय, स्वजातीचा गर्व बाळगला जातोय. मात्र परजातीला क्षीण मानले जाते. ही ना छत्रपतींची शिकवण ना शाहू-फुले-आंबेडकरांची शिकवण. परंतु राजकारणातली गणितं जुळवताना काही नेत्यांना या गोष्टी कराव्याच लागतात. या
आंदोलनाचे यश
आणि अपयश
दोन वाक्यात सांगतो, मराठा समाजाला जे कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे ते या आंदोलनाचे यशच आहे. त्याचबरोबर मराठ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वस्तीगृह उभारणे, मुलींना मोफत शिक्षण देणे, यासह अन्य काही निर्णय झाले आहेत ते या आंदोलनामुळेच झाले आहेत. मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्यासाठी सग्यासोयर्यांची जी अट घालण्यात आली आहे आणि ती जी अधिसूचना काढण्यात आली आहे ती आंदोलक आणि सरकार यांच्यातली तडजोड नक्कीच आहे. आता फक्त सगेसोयरे या शब्दावर जो काही गोंधळ होणार आहे आणि तो गोंधळ रोखण्यासाठी सर्वप्रथम सग्यासोयर्या या शब्दाची व्याख्या ठरवावी लागणार आहे आणि ही व्याख्या ठरविली गेल्यानंतर अधिसूचनेत जे आक्षेप मागवण्यात आले आहेत त्या आक्षेपांसोबत लढा द्यावा लागणार आहे. जर सरकारने आक्षेपाची दखल न घेता सगेसोयरे या शब्दाची व्याख्या ठरवून आरक्षण दिचलं तर ते टिकणार नाही त्यामुळे भविष्यात कायदेशीर लढाई ही लढावी लागणार आहे. आता फक्त मराठ्यांचा आनंदोत्सव आणि या मराठा आंदोलनाकडे पाहण्याची ज्याची त्याची नजर असेल, सत्य एवढेच या आंदोलनातून मराठ्या पदरी बरेच काही पडले आणि या आंदोलनातून मराठ्यांच्या पदरी बरेच काही पडणे बाकी. यालाच तह म्हणतात आणि तिथेच मराठ्यांचं भविष्यही आहे.