नेकनूर (रिपोर्टर): उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात प्रक्षोभात्मक शब्द प्रयोग करत सर्वोच्च न्यायालयासह बीड जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या जमावबंदीचे उल्लंघन करून धार्मिक कार्यक्रमाच्या स्टेजचा वापर आरक्षण व राजकीय हेतूसाठी केल्याचा आरोप करत नेकनूर पोलिसात मराठा आंदोलक मनोज जरांगे स्वप्नील गलधर यांच्यासह 16 जणांवर गुन्हे काल दाखल करण्यात आले आहेत. तत्पुर्वी अंबाजोगाई पोलिसातही जरांगेंसह त्यांच्या काही कार्यकर्त्यांवर परवा गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत बीड जिल्ह्यात जरांगे पाटील यांच्यावर सातपेक्षा अधिक गुन्हे दाखल झाल्याचे सांगण्यात येते.
याबाबत अधिक असे की, नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तांदळवाडी घाट येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी एका धार्मिक कार्यक्रमाला भेट दिली. त्यावेळी उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला. सदरचा संवाद हा नियम व कायद्याचे उल्लंघन करणारा असल्याचे ठरवून जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांविरोधात नेकनूर पोलिसात विशाल क्षीरसागर या पोलीस कर्मचार्याने फिर्याद दिली. त्यामध्ये मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे सांगून जिल्हाधिकारी, बीड यांनी लागू केलेल्या आदेशा उल्लंघन केले. त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रमाच्या स्टेजचा वापर हा आरक्षण व राजकीय हेतूसाठी करून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख करत प्रक्षोभक वक्तव्य केले व धार्मिक कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शविणार्या लोकांना भडकवले. फडणवीस यांच्याविरुद्ध द्वेषभावना निर्माण होईल, असे खोटे वक्तव्य केले म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, स्वप्नील गलधर, बळवंत कदम, हनुमान मुळीक, बळीराम अर्जुन सिरसट, महादेव हरीभाऊ खोेसे, नामदेव घोडके, जगन्नाथ घोडके, बळीराम खोसे, अनिल विक्रम खोसे, चक्रधर अंकुश खोसे, गंगाधर काळकुटे, ईश्वर रामा सिरसाट, लक्ष्मण महाराज भागडे, सखाराम खोसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ. बळवंत हे करत आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वीच जरांगे यांच्या विरोधात अंबाजोगाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यात जरांगे पाटील यांच्या विरोधात सातपेक्षा अधिक गुन्हे दाखल झाल्याचे सांगण्यात येते.