2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधक चांगलेच कामाला लागले. भाजपाची काही प्रमाणात हवा कमी होवू लागली. येत्या निवडणुकीत आपण चांगलं वर्चस्व निर्माण करु शकतो. याचा आत्मविश्वास देशातील काही प्रमुख घटक पक्षांमध्ये निर्माण झाला. काँग्रेस कात टाकत आहे. देशामध्ये अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांच्या बाबतीत आवाज उठवणार्याला जनता नक्कीच प्रतिसाद देऊ शकते. आठ वर्षाच्या भाजपाच्या सत्तेच्या कार्यकाळात बरंच पाणी पुलाखालून गेलं. 2014 ची भाजपाची पहिली टर्म होती. या टर्म मध्ये भाजपाच्या विरोधात सहसा कुणी बोलायला तयार होत नव्हतं. विरोधक ही गप्प पडले होते. आज तसं नाही. विरोधक बोलू लागले. लोक चर्चा करु लागले आणि भाजपाच्या चुकीच्या राजकारणाला विरोध होवू लागला. पुढचा पंतप्रधान कोण? यावर तर्क, वितर्क लावले जावू लागले. भाजपाच्या विरोधात आघाडी स्थापन होणार की, घटक पक्ष आप, आपल्या पध्दतीने निवडणुक लढवणार, याचं विश्लेषण केलं जावू लागलं. नितीश कुमार यांनी भाजपापासून फारकत घेतली. त्यामुळे नितीश तिसर्या आघाडीचे उमेदवार असतील का? काँग्रेसने भारत जोडो यात्रेची सुरुवात केली. राहूल गांधी हे पंतप्रधानपदासाठी आग्रही आहेत, हे लपून राहत नाही. खा. शरद पवार यांच्या नावाची अधून,मधून चर्चा होत असते. ममता बॅनर्जी यांना देखील पंतप्रधानपदाचं स्वप्न पडलेलं आहे. केजरीवालसारखे नेते ही मागे नाहीत. लोकसभा निवडणुकीला एक वर्षाचा कालावधी असला तरी दिल्लीच्या राजकारणाची हवा चांगलीच गरम होवू लागली.
मुरब्बी नितीश कुमार
नितीश कुमार बिहारचे सात वेळा मुख्यमंत्री राहिले. त्यांनी स्वत:च्या ताकदीवर आपला पक्ष उभा केला. नितीश हे सर्वधर्मीयांना सोबत घेवून चालत असतात. त्यामुळे त्यांचा राजकारणातला चेहरा सर्वांना भावणारा आहे. मध्यंतरी त्यांनी भाजपाशी जुळवून घेतलं होतं. बिहारमध्ये भाजपाला सोबत घेवूनच त्यांनी गत विधान सभेची निवडणुक लढवली होती. गेल्या काही दिवसापुर्वी त्यांनी भाजपाला सोडलं आणि लालू प्रसाद यादव यांच्या पक्षा सोबत जुळवून घेतलं. नितीश यांनी भाजपाला सोडल्याने त्यांची दिल्लीच्या राजकारणात पुन्हा एकदा जोरदार चर्चा होवू लागली. 2014 च्या वेळी ही नितीश कुमार यांचं नाव पंतप्रधानपदासाठी चर्चेत होतं. तिसरी आघाडी स्थापन करुन नितीश कुमार निवडणुक लढवणार का? अशी चर्चा होत होती. मात्र नितीन भाजपासोबत गेल्यामुळे त्याचं नाव पाठीमागे पडलं. नितीशकुमार याचे देशातील सगळ्या पक्षाशी चांगले संबंध आहेत. नितीशकुमार दिल्लीत गेले तर लालू पुत्र तेजस्वी यादव यांना आनंदच होईल, कारण बिहारची सत्ता अलगत त्यांच्या ताब्यात अनेक वर्ष राहू शकते. गेल्या निवडणुकीत तेजस्वी यादव यांचं बहुमत अगदी कमी मतामुळे हुकलं होतं. नितीश यांच्या सहकार्यामुळे तेजस्वी यादव सध्या बिहारच्या सत्तेत आले. सत्ता असल्यानंतर पक्ष वाढीसाठी बराच फरक पडतो. येत्या निवडणुकीत बिहारमध्ये लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांचा पक्ष जिंकू शकेल? तशी व्युहरचना हे दोन्ही पक्ष करतील. काँग्रेस पक्षाशीही नितीश कुमार याचं इतकं वाईट नाही. वेळ, काळ पाहून काँग्रेस सुध्दा पंतप्रधान पदासाठी नितीश यांना सहकार्य करु शकते? भाजपापेक्षा नितीश बरे अशी भुमिका काँग्रेस घेवू शकते. काही प्रादेशीक पक्ष नितीश यांच्या बाजुने आहेत. त्यामुळे नितीश यांनी येत्या निवडणुकीत चांगला जोर लावला तर नक्कीच बरचं काही परिवर्तन होऊ शकते?
काँग्रेसची यात्रा
काँग्रेसला पक्ष सावरणं गरजेचं आहे. काँग्रेस पक्ष प्रगतीकडे वाटचाल करत नसल्याने आपल्या पुढील भविष्याची चिंंता करत काँग्रेसमधील काही नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. काही भाजपात जाण्याच्या विचारात आहेत. नुकतचं गुलाब नबी आझाद यांनी पक्षाला सोडचिट्टी देवून ते आता नवा पक्ष स्थापन करत आहेत. राज्यातील काही काँग्रेसचे नेते पक्षाला सोडणार असल्याच्या वावड्या उठू लागल्या. काँग्रेस पक्ष सक्षम करण्याची जबाबदारी नेतृत्वाची असते. एक वर्षापासून काँग्रेसला अध्यक्षच नाही. नवीन अध्यक्ष कोण होणार हे अजुन निश्चीत झालेलं नाही. राहूल गांधीच पुन्हा अध्यक्ष होतात की, एखाद्या नवख्या तरुणाला अध्यक्ष म्हणुन संधी दिली जाते हे अजुन समोर आलेलं नाही. नवीन व्यक्तीच्या गळ्यात काँग्रेस अध्यक्षपदाची माळ पडली तर नक्कीच एक वेगळा इतिहास रचना जाईल. आता पर्यंत गांधी घराण्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली आहे. काँग्रेसची सत्ता जावून आठ वर्ष पुर्ण झाली. आठ वर्षात पक्षाची प्रकृती सुधारण्याची खुप मोठी संधी काँग्रेसला होती, या आठ वर्षात पक्षाची विशेष काही प्रगती झालेली नाही. पक्षाने वेगवेगळे कार्यक्रम घेवून कार्यकर्त्यात एक नवचैतन्य निर्माण करण्याचं काम करायचं असतं, पण पक्ष असले कुठलेही कार्यक्रम घेतांना दिसत नाही. राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रा’ सुरु केली. ही यात्रा 12 राज्यात जाणार असून जवळपास 150 दिवस यात्रा चालणार आहे. या यात्रेतून कार्यकर्ते जोडण्याचे काम राहुल गांधी करत आहे. यापुर्वी भाजपाने अशाच पध्दतीची यात्रा काढली होती, पण ती रथयात्रा होती. या रथयात्रेतून बराच फायदा भाजपाला झाला होता. अडवाणी यांनी ही यात्रा काढली होती. या यात्रेचं सर्व श्रेय अडवाणी यांना जाते. आज भाजपा मोदींची म्हणुन ओळखले जाते. मोदींच्या राज्यात अडवाणी अडगळीला पडलेले आहेत. ज्यांच्यामुळे भाजपा वाढला. त्यांना सध्याचे नवीन भाजपाचे नेते विसरुन गेले आहेत. खा. राहूल गांधी हे पहिल्यांदाच इतका मोठा पक्ष जोडणीसाठी कार्यक्रम आयोजित करत आहेत. त्यांच्या या यात्रेतून पक्षाला फायदा होवू शकतो, तो किती प्रमाणात होणार हे येत्या निवडणुकीत दिसेल.
नितीश, पवार भेट
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव पंतप्रधानपदासाठी गेल्या अनेक वर्षापासून जोडले जाते, पण तसा काही योग अजुन आलेला नाही. पवार यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून स्वत:चा राष्ट्रवादी पक्ष 1999 साली स्थापन केला. पक्ष स्थापन केल्यापासून आज पर्यंत ज्या काही लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्या प्रत्येक निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी ताकद द्या, असाच प्रचार केला होता. काही घटक पक्षांना सोबत घेवून नवं राजकीय समीकरण जुळतं का? याची सुध्दा आज पर्यंत चाचपणी झाली, पण त्याला काही यश आलं नाही. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात खा. पवार दहा वर्ष केंद्रीय कृषी मंत्री होते. त्यांनतर भाजपाची सत्ता आली. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने दोन अंकीच्या पुढे आपला खासदारकीचा आकडा पार केला नाही. आपली ताकद कमी आहे हे राष्ट्रवादीच्या लक्षात आलेलं आहे. येत्या काळात संधी आलीच तर त्याचं सोनं करु ही अपेक्षा पवारांच्या मनात नक्कीच असणार आहे. आज पर्यंत नितीश भाजपा सोबत होते, त्यामुळे पवारांनी त्यांच्याशी कधी जाहीर संवाद साधला नाही, किंवा त्यांच्याशी चर्चा सुध्दा केली नाही. नितीशकुमार भाजपापासून दुर गेल्याने पवारांनी नितीश कुमार यांच्याशी संवाद साधला. दोन नेत्यात चर्चा झाली. या दोन्ही नेत्यातील चर्चा ही नक्कीच पुढील राजकारणाच्या रणनितीवरच झाली असणार, हे दोन्ही नेते पंतप्रधानपदासाठी चर्चेत असतात. दोघांना अजुन पंतप्रधान होता आलं नाही. राजकीय धागे जुळवण्यात दोन्ही नेते माहीर आहेत. येत्या काळात हे दोघे भाजपासमोर कसे आव्हान उभे करतात हे पाहावे लागेल.
योग जुळून येईल का?
राजकारणात योग जुळून येणं महत्वाचं असतं. भाजपाला सगळेच प्रादेशीक पक्ष कदरले आहेत. देशातील बहुतांश जनतेला परिवर्तन हवं आहे. मोदी यांनी जे काही स्वप्न दाखवलं होतं, ते स्वप्न पुर्ण झालेलं नाही. महागाईमुळे लोक बेजार आहेत. त्यात भाजपावाले सुध्दा आले. मोदी यांच्या समोर चांगला पर्याय उभा केला पाहिजे असं विरोधकांना वाटतं. उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिसा, तेलंगणा, महाराष्ट्र, दिल्ली या राज्यात लोकसभेच्या 263 जागा आहेत. या राज्यात प्रादेशीक पक्षांची चलती आहे. उत्तरप्रदेशमध्ये अखिलेश यादव यांचा पक्ष चांगला मजबुत आहे. तो पक्ष आज राज्याच्या सत्तेत नसला तरी लोकसभेच्या चांगल्या जागा या पक्षाला मिळू शकतात. बंगालमध्ये ममता बॅनर्जी याचं वर्चस्व आहे. तेलंगणात राव सत्तेत आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्रीत आली तर बरचं काही बदलू शकतं. शिवसेनेला भाजपामुळे खुप काही वेदना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे वचना काढण्यासाठी शिवसेना वाट्टेल ते करायला तयार आहे. केजरीवाल यांचं चांगलं वर्चस्व निर्माण होत आहे. या प्रादेशीक पक्षांचे आपल्या राज्यात चांगलं संघटन आहे. यांना एकत्रीत करण्याचं काम नितीश आणि पवारांनी केलं तर मोठी ताकद निर्माण होवू शकते. यात काँग्रेसचा सहभाग असल्यास सोन्याहुन पिवळं होवू शकतं. कोणतीही सत्ता जास्त दिवस टिकत नसते. भाजपाला सत्तेचा दर्प चढला. तपास यंत्रणाचा गैरवापर करुन विरोधकांना संपवण्याचा कुटील डाव आखला जात आहे. त्यामुळे भाजपाच्या विरोधात रोष वाढू लागला. येत्या निवडणुकीत भाजपाला दहा वर्ष पुर्ण होत आहे. या दहा वर्षात बरंच काही जनतेनं सोसलं आहे. प्रत्येक दहा वर्षानी एक नवा बदल घडलेला आहे हे आज पर्यंतच्या देशाच्या राजकारणात पाहावयास मिळाले आहे. काँग्रेस आणि प्रादेशीक पक्षांची एकत्रीत मोट बांधली गेली तर बदल नक्की आहे, पण सर्व विरोधक एकत्रीत येणं तितकं सहन शक्य होईल का?