आवाज आमचा, साथ तुमची, बघता काय सामील व्हा
बीड (रिपोर्टर) कधी अल्पसंख्यांक समाजावर अन्याय तर कधी समाजातील लोकांवर हल्ले तर कधी मुस्लिम धर्माचे पैगंबर यांच्याबाबत अपशब्द काढून मुस्लिमांच्या भावना चिरडल्या जात आहेत. देशभरात द्वेषाचे राजकारण सर्रासपणे सुरू आहे. अशा भयावह आणि भीतीदाय परिस्थितीत अखंड भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षात संविधानाला मुठमाती देत सरकार हत्यारे आणि बलात्कार्यांची बाजू घेत त्यांची शिक्षा माफ करत आहेत. अशा सरकारच्या अन्यायाविरोधात उद्या 15 सप्टेंबर वार गुरुवार रोजी कलेक्टर कचेरीवर महिलांचा संविधान बचाव मुकमोर्चा निघत असून या मोर्चाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे गेली असून बीड तालुक्याचा मोर्चा किल्ला मैदान येथून कलेक्टर कचेरीवर धडकणार आहे तर अन्य तालुक्यात मोर्चेकरी तहसील कार्यालयावर धडकून आपला निषेध नोंदवणार आहेत. संविधान बचाव मुकमोर्चात हजारोंच्या नव्हे लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन सर्वस्तरातून केले जात आहे.
उस देश मे लगता है अदालत नही होती, जिस देश मे इंसान की हिफाजत नही होती, हर शख्स सर पे कफन बांधके निकले, हक के लिए लढना तो बगावत नही होती, अन्याय करणार्यापेक्षा अन्याय सहन करणारा सर्वात मोठा गुन्हेगार असतो, असे संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे. त्यामुळे लोकाहो, सरकारच्या अंधाधूंद आणि धर्मांध धोरणाविरोधात आवाज उठवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी एकत्रित या म्हणत संविधान बचाव (पान 7 वर)
समितीने उद्या जिल्हाभरात महिलांच्या मुकमोर्चाचे आयोजन केले आहे. गेल्या काही वर्षांपासून सर्वसमावेशक असलेल्या अखंड भारतात थेटपणे धर्मांध शक्ती आपल्या स्वार्थी कामांना अंजाम देण्याहेतू मुस्लिम समाजाला टार्गेट करत कधी लोकांवर हल्ले करतात तर कधी मुस्लिम धर्माचे सर्वस्व मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात अपमानजनक टिपणी करत आपली विकृती समाजासमोर आणतात. अशा लोकांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी कायदा करा, बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींची माफ केलेली शिक्षा रद्द करून त्यांना पुन्हा शिक्षा द्या, बलात्काराच्या घटनांना आळा घाला, बलात्कार्यांना फाशी द्या, मुस्लिम धर्मगुरू मौलाना कलीम सिद्दीकी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप मागे घ्या, त्यांची सुटका करा, आसाममध्ये होत असलेल्या मदरशाविरुद्ध कारवाई तात्काळ थांबवा, पाडलेले मदरसे पुन्हा बांधा, अल्पसंख्याक समाजावर होत असलेले हल्ले, अन्याय पाहता अॅट्रॉसिटीसारखा कायदा करा, अशा महत्वपुर्ण मागण्या घेत महिलांचा भव्य निषेध मुकमोर्चा कलेक्टर कचेरीवर धडकणार आहे. बीडमधला मोर्चा हा किल्ला मैदान येथून निघून कारंजा रोड, राजुरीवेस, बशीरगंज, छत्रपती शिवाजी महाराज चौक असा निघणार आहे. या मोर्चात हजारोंच्या नव्हे लाकोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
तालुकास्तरावरही निघणार मोर्चे
संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने बीड पाठोपाठ अंबाजोगाई, परळी, माजलगाव, आष्टी, पाटोदा, धारूर यासह अन्य ठिकाणीही भव्यदिव्य मोर्चे निघणार असून या मोर्चाची पुर्ण तयारी झाली आहे. मोर्चात तालुकास्तरावर गावपातळीवरील लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.