बीड (रिपोर्टर) ऑगस्ट महिन्यामध्ये बीड जिल्ह्यात फक्त तीनच दिवस पाऊस पडला. 27 दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या सोयाबीनला 25 टक्के विम्याचा अग्रीम देण्याची मागणी सर्वस्तरातून झाली होती. जिल्हा प्रशासनाने 47 मंडळांना विमा देण्याचे मंजूर केले होते, मात्र विमा कंपनीने यात आता खोडा घातला. 27 मंडळांना विमा देण्यास नकार दिल्याने जिल्हा प्रशासनाने आज पुन्हा अधिकार्यांची बैठक घेऊन 47 मंडळांना विम्याचा लाभ द्यावा, यासाठी प्रधान सचिवांना पत्र पाठवले आहे. सोबतच विमा कंपनीचे राज्य समन्वयक देवीदास कोळी यांनीही दैनिक रिपोर्टरला बोलताना उर्वरित 20 मंडळांबाबत कृषी विभागाशी चर्चा करून दोन दिवसात सकारात्मक तोडगा काढला जाईल, असे सांगितले.
बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी सोयाबीनची सर्वाधिक लागवड झाली. ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने दडी मारली. एका महिन्यात फक्त तीन दिवस पाऊस पडला. 27 दिवस पाऊस पडला नसल्याने सोयाबीन पिकाचं नुकसान झालं. नुकसानग्रस्त शेतकर्यांना विम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी सर्वस्तरातून करण्यात येत होती. पहिल्या टप्प्यात 16 मंडळांना 25 टक्क्याचा लाभ देण्यात आला. तशी अधिसूचना काढण्यात आली. त्यानंतर 21 आणि तिसर्या टप्प्यात 10 अशा 47 मंडळांना विमा देण्याची अधिसूचना प्रशासनाने काढली होती. विम्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालया-समोर सर्व पक्षांच्या वतीने आंदोलनुसद्धा करण्यात आले होते. आता मात्र विमा कंपनीने सर्व मंडळांना विमा देण्यास नकार दिला. 27 मंडळांना विमा देण्याबाबत कंपनीने नकार दर्शवल्यानंतर आज जिल्हाधिकारी यांनी कृषी अधिकार्यांची बैठक घेऊन सर्वच 47 मंडळांना विमा द्यावा, त्याबाबत कृषी प्रधान सचिवांना पत्र पाठवले आणि या पत्राद्वारे आपली बाजू मांडण्यात आली आहे. दरम्यान या बाबत विमा कंपनीचे राज्य समन्वयक यांच्याशी रिपोर्टरने संपर्क साधला असता ते म्हणाले की, कृषी विभागाशी चर्चा करून दोन दिवसात उर्वरित मंडळांबाबत सकारात्मक तोडगा काढला जाईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.