बीड (रिपोर्टर) केंद्र सरकार संपूर्ण देशामध्ये जलशक्ती अभियान राबवत असून पावसाचा एक एक थेंब पकडून तो जमिनीत मुरवणे आणि पाणी पातळी वाढवणे यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात या अभियानाची सुरूवात आणि जिल्ह्यात झालेली कामे याची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे दोन सदस्यीय पथक बीड जिल्ह्याच्या दौर्यावर आजपासून आले असून ते जिल्ह्यातील बंधारे, घनदाट वने, शेततळे इ.कामाची पाहणी हे पथक करणार आहे.
केंद्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागाचे उपसचिव प्रियांक चतुर्वेदी आणि पुणे येथील केंद्र सरकारच्या केंद्रीय पाणीपुरवठा संशोधन संस्थेचे संचालक सी.शैल्यम हे दोन सदस्यीय पथक बीड जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकार्यासमवेत जिल्ह्यातील प्रमुख अधिकार्याची बैठक घेवून जलशक्ती अभियानाला सुरूवात केली. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये पाणी पातळीमध्ये काय काय बदल झाले? कोणत्या वर्षी पाणी पातळी कमी झाली? कोणत्या वर्षी पाणी पातळी वाढली? याचाही अहवाल हे पथक केंद्र सरकारला देणार आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात जो पाऊस बीड जिल्ह्यात पडतो त्याची सरासरी क्षमता पातळी किती आहे? त्या प्रमाणामध्ये सरकारी यंत्रणा हे पाणी साठवून ठेवण्यासाठी काय काय प्रयत्न करता? आणखी पुढे काय काय प्रयत्न गरजेचे आहे? जिल्ह्यामध्ये एकूण झालेले कोल्हापूरी बंधारे, शेततळे, रोजगार हमी योजनेतून लावलेली वृक्षलागवड, रोजगार हमी योजनेतून खोदलेली शेततळे, रोजगार हमी योजनेतील सार्वजनिक शेतकर्यांच्या विहिरी, वन विभागाने जिल्हयामध्ये घनदाट वृक्षलागवड या अंतर्गत केलेल्या वनाची लागवड त्यातून पाणीपातळी किती वाढली? जलयुक्त शिवार अंतर्गत झालेली कामे या सर्वांची पाहणी हे पथक दोन दिवस करणार आहे. जिल्ह्यातील पाणीपातळी वाढण्यासाठी आणखी पुढे काय करावे लागणार आहे. याचा अहवाल हे पथक जिल्हा प्रशासन आणि केंद्र सरकारला सोपवणार आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुकटे (प्रभारी), जिल्हा जलसंधारण अधिकारी परांडे, जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी निंबाळकर आदि अधिकारी आणि कर्मचारी या जलशक्ती अभियनाच्या बैठकीला उपस्थित होते.