अंबाजोगाई (दि. 26) – अंबाजोगाई तालुक्यातील बनसारोळा येथील ग्रामस्थांना माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला असून, घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या 8 कोटी 91 लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेस जलजीवन मिशन मधून मान्यता देण्यात आलीय; तसेच या कामाची निविदा प्रक्रिया देखील सध्या अंतिम टप्प्यात आहे. या कामासाठी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता आदी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यासाठी श्री. मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने पाठपुरावा केला. मा.धनंजयजी मुंडे यांच्या निर्देशानुसार त्यांचे स्वीय सहाय्यक तथा बनसारोळा गावचे भूमिपुत्र खंडू गोरे यांनी या कामातील सर्व तांत्रिक अडथळे दूर करून कामाला सुरू करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरील सर्व कार्यवाही जलदगतीने पूर्ण करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे राज्याचे उपमुख्यमंत्री असताना 1996 साली या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र पुढे काही कारणांनी पाणी पुरवठा करण्याचे हे काम अर्धवट राहिले होते. त्या कामास आता माजी मंत्री आ धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून तसेच मा बजरंग बप्पा सोनवणे यांच्या मार्गदर्शनखाली खंडू गोरे यांच्या पाठपुराव्याने यश आले आहे. बनसारोळा ग्रामस्थांची नळाद्वारे पाणी पुरवठा होण्याची मागणी अनेक वर्षांनी पूर्ण होत असल्याने ग्रामस्थांच्या वतीने धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक खंडू गोरे, गावच्या सरपंच ,उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आदींनी आ. श्री. मुंडे साहेबांचे व बजरंग बप्पा सोनवणे यांचे आभार मानले आहेत.
आदरणीय धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून बनसरोळ्याचा
सर्वांगीण विकास घडवण्यासाठी सदैव कटीबद्ध – खंडू गोरे
आमचे नेते धनंजय मुंडे साहेब जिल्हा परिषद सदस्य असताना बनसारोळा गावचे ग्रामदैवत व पंचक्रोशीत प्रसिद्ध देवस्थान श्री बनेश्वर सप्ताहास भेट दिली होती . त्यावेळी विकास, सुशोभीकरण व सामाजिक सभागृह बांधण्याचा शब्द त्यांनी ग्रामस्थांना दिला होता. साहेबांच्या माध्यमातून श्री बनेश्वर देवस्थानचे रूप पालटत आहे याचा मनस्वी आनंद आहे. एवढेच नव्हे तर मुंडे साहेबांच्या माध्यमातून व मा बजरंगबप्पा सोनवणे यांच्या मार्गदर्शना खाली मा मुंडे साहेबांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात गावात अंतर्गत सिमेंट रस्ते, नाल्या, विद्युतीकरण, स्मशान भूमी, सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून रस्ते, व गावांच्या जिव्हाळ्याची नवीन पाणी पुरवठा योजना इत्यादी अनेक कामे मार्गी लावता आली, याचा आनंद व अभिमान आहे, तसेच श्री बनेश्वराच्या कृपेने हे माझेही भाग्य आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया खंडू गोरे यांनी व्यक्त केली आहे…!