क्षीरसागर, फडणवीसांच्या भेटीगाठीने प्रवेशाचे संकेत
बीड (रिपोर्टर) राज्याच्या राजकारणामध्ये अनन्यसाधारर महत्व असलेल्या बीड जिल्ह्यात आगामी काळात मोठ्या राजकीय उलथापालथी होण्याच्या दाट शक्यता असून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढती जवळीक पाहता लवकरच जयदत्त क्षीरसागर भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जिल्ह्यासह मुंबईतील वरिष्ठ नेत्यांच्या गोटात होत असल्याने आणि गेल्या दीड वर्षाच्या कालखंडात घडत असलेल्या घटनाक्रमावरून या चर्चांना अधिक वाव मिळत आहे. गहिनीनाथ गडावर मुंडे भगिनींची गैरहजेरी आणि जयदत्त क्षीरसागरांची हजेरी क्षीरसागरांच्या भाजप प्रवेशाचे संकेत देणारे असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे ठाकरे गटात असताना त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बीडमध्ये आणून त्यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमामध्ये जयदत्त क्षीरसागरांना ठाकरे गटाच्या शिवसेनेतून बाहेर काढण्यात आले. तेथून फडणवीस आणि क्षीरसागर यांची अधिक जवळीक वाढल्याचे जिल्ह्यासह उभ्या महाराष्ट्राने पाहितले. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यातला अंतर्गत वाद आणि त्या वादातून पंकजा मुंडेंची अस्वस्थता ही गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रकर्षाने दिसून येते. गेल्या पंधरा दिवसांच्या कालखंडामध्ये देवेंद्र फडणवीसांचे बीडमध्ये दोन वेळा कार्यक्रम झाले. या कार्यक्रमाला मुंडे भगिनींनी गैरहजेरी दर्शविली. मात्र गहिनीनाथ गडावर फडणवीसांच्या व्यासपीठावर जयदत्त क्षीरसागरांनी हजेरी लावून क्षीरसागरांनी आपल्या कार्यकर्त्यांना एकप्रकारे संकेत दिले. जयदत्त क्षीरसागर हे बीडमधील मोठे नेते असून भाजपाला अपेक्षीत ओबीसी चेहरा असल्याने भाजपा म्हणण्यापेक्षा फडणवीस क्षीरसागरांच्या हाती भाजपाचे सुत्र देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते. यापुर्वीही क्षीरसागरांसह बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या एका नेत्यासमवेत फडणवीसांची औरंगाबाद येथे बैठक झाली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंच्या बालेकिल्ल्यात आपले लक्ष अधिक प्रमाणात केेंद्रित केल्याचे दिसून येते. गहिनीनाथ गडावर पंकजांचा नामोल्लेख टाळणे, नाथांच्या आशीर्वादावर जिल्ह्यातील गडाच्या विकासाचे पालकत्व घेणे आणि व्यासपीठावर अपेक्षीत नेतृत्वाला स्वत:सह जनतेसमोर मांडणे हे फडणवीसांचे राजकीय समिकरण नव्हे तर बीड जिल्ह्यातील राजकारणाचे भविष्य असल्याचे बोलले जाते. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर हे लवकरच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील, अशी चर्चा जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय गोटात होताना दिसून येते.