अंबाजोगाई (रिपोर्टर): खरीप हंगाम 2025-2026 पीकविमा तात्काळ देण्यात यावा, खतदरवाढ कमी करावी, शेतकरी कर्जमुक्त योजनेत टाकलेल्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात या प्रमुख मागण्यांसह शेतकर्यांच्या अन्य महत्वाच्या मागण्यांसाठी न्याय द्या… न्याय द्या… शेतकर्यांना न्याय द्या, शेतकरी झिंदाबादचे नारे देत आज हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. अंबाजोगाई-लातूर या महामार्गावर ठिय्या मांडत बर्दापूरजवळ रस्ता रोको आंदोलन केले. तब्बल दीड ते दोन तासांच्या रस्ता रोको आंदोलनाने रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहतूक ठप्प होऊन शेकडो वाहनांची चाके एका जागी थांबले होते आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे एक बॅनर थेट एसटी बसला लावले.



राज्य शासनाने शेतकर्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली मात्र ही कर्जमाफी शेतकर्यांना मिळवण्यासाठी त्यामध्ये जाचक अटी टाकल्या. यामुळे शेतकर्यांत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. खरीप हंगाम 2025-2026 चा पिकविमा अदद्याप शेतकर्यांना मिळालेला नाही. खताची भरमसाठ दरवौ झालेली आहे. यामुळे संतापलेल्या शेतकर्यांनी आज एकत्रित येत अंबाजोगाई-लातूर महामार्गावर बर्दापूरजवळ रस्ता रोको आंदोलन केले. हजारो शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. प्रचंड घोषणाबाजी करत फक्त कर्जमाफी सरसकट करा, शेतकरी कर्जमुक्त योजनेतील जाचक अटी रद्द करा, यासह अन्य मागण्यांचे फलक घेऊन आंदोलक रस्त्यावर ठिय्या मांडून बसले होते. दीड ते दोन तासांच्या या रस्ता रोकोने महामार्गावरील दोन्ही बाजूस मोठया प्रमाणावर वाहने ठप्प झाली होती. आंदोलकांनी या वेळी राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध केला. सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. या रस्ता रोकोमुळे वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली होती.










