आष्टी (रिपोर्टर) बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना पून्हा शिक्षा ठोठवावी आणि ईशनिंदा विरोधात कठोर कायदा करण्यात यावा या मागण्यासाठी आज आष्टी शहरातील महिलांनी तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये हजारो महिला सहभागी झाल्या होत्या.
गुजरात येथील बिल्कीस बानो प्रकरणातील नराधम आरोपींना तेथील सरकारने शिक्षेत सुट दिल्याने त्याचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. सदरील आरोपींना पून्हा शिक्षा ठोठावावी, त्याचबरोबर ईशनिंदेविरोधात कठोर कायदा करावा या प्रमुख मागण्या घेवून आज शहरातील मुस्लिम महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. हातात काळा झेंडा घेवून या महिला मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. महिलांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना दिले. मोर्चाचे योग्य नियोजन करण्यात आले होते. पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व संघर्ष समिती आष्टीच्यावतीने करण्यात आले.