अन्याय,अत्याचाराविरोधात कडक कायदे करण्याची मागणी
माजलगाव (रिपोर्टर) या देशात वारंवार अल्पसंख्यांक समाजाला टार्गेट करून त्यांच्यावर अन्याय, अत्याचार केले जातात. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला ठोठावलेली शिक्षा गुजरात सरकारने माफ केली. यासह विविध मागण्या घेवून माजलगावमध्ये महिला आक्रमक होत संविधान बचाओ संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली एकत्र होत प्रचंड मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
बिल्कीस बानो यांच्यावर अत्याचार करून त्यांच्या नातेवाईकांचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने अकरा आरोपींना दोषी ठरवले होते. मात्र अल्पसंख्यांक विरोधी सरकारने आरोपींना निर्दोष मुक्त केले. याचा महिलांमध्ये प्रचंड रोष आहे. यासंदर्भात संविधान बचाओ संघर्ष समितीने माजलगावमध्ये महिलांचा प्रचंड मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. त्याअनुषंगाने आज सकाळी 11 वाजता शहरातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात हजारो महिला एकत्र झाल्या. त्यानंतर शिस्तबध्द पध्दतीने महिलांचा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे उपविभागीय कार्यालय माजलगाव येथे धडकला. यावेळी महिलांनी रोष व्यक्त करत आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले. या मोर्चात काळे झेंडे घेवून लेकरा-बाळासह महिला सहभागी झाल्या होत्या. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बिल्कीस बानो प्रकरणातील सामुहिक बलात्कार करणारे आणि नातेवाईकांची हत्या करणारे ज्या आरोपींना मोकाट सोडले आहे त्यांना पून्हा अटक करा. यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.