माजलगाव (रिपोर्टर) माजलगाव धरण क्षेत्रामध्ये काल धुव्वाधार पाऊस झाल्याने माजलगाव धरण पहाटेच्या दरम्यान शंभर टक्के भरले. यामुळे आज सकाळी धरणाचे तीन दरवाजे उघडून 1200 क्युसेक्सने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असून सिंदफणा नदी काठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
काल सायंकाळच्या दरम्यान जिल्ह्यातील बहुतांशी भागात परतीच्या पावसाने धुव्वाधार हजेरी लावली. माजलगाव धरणक्षेत्रामध्ये रात्रभर मोठा पाऊस (पान 7 वर)
झाला. प्रत्येक वर्षी परतीच्या पावसावर माजलगावचे धरण भरलेले असते. यावर्षीही परतीच्या पावसाने धरणे भरले असून पावसाळा सुरू होण्यापुर्वी धरणात 27 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. गुरुवारी हे धरण 99 टक्के भरले होते. धरण क्षेत्रात रात्रभर पाऊस सुरू झाल्याने पहाटेच्या दरम्यान हे धरण शंभर टक्के भरले. धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास धरणाचे तीन गेट उघडून प्रत्येकी चारशे क्युसेक्सने नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याची माहिती येत आहे. आणखी पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे सिंदफणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे इशारा देण्यात आला आहे.
माजलगाव धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाच्या पाण्यावर माजलगाव धरण 100 टक्के भरले असून पुनर्वशीत 11 खेडी, बीड शहर, माजलगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे तर बागायतदार शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
धरण सद्यःपरिस्थिती
पाणी पातळी – 431.80 मिटर.
उपयुक्त पाणीसाठा – 312.00 दलघमी.
टक्केवारी – 100 टक्के.
आवक – एक हजार 218 क्युसेक.
विसर्ग – एक हजार 218 क्युसेक.
उघडलेले दरवाजे – तीन